ग्रामस्थांच्या मते, पांदण रस्ते, नालीवरील रपटा, अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी, शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांना आर्थिक मदत आणि शौचालय योजना यांसारख्या अनेक विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. या कामांसाठी आलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेला नाही, असा त्यांचा दावा आहे.
या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सरपंच संजना बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, या परिषदेत त्या प्रत्येक प्रश्नावर उडवाउडवीचं उत्तर देत होत्या. जनतेच्या पैशाचा हिशोब देणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असताना, सरपंचांच्या या उत्तरांमुळे त्यांच्यावरील संशय आणखीच बळावला आहे.
सांगोडा ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप; सरपंच संजना बोंडे यांची उडवाउडवीची उत्तरे?
या वादामुळे गावातील आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे दालमिया सिमेंट कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प. कंपनीने जमीन अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितलं होतं. ग्रामस्थांनी हा ठराव ग्रामसभेत चर्चेला घ्यावा अशी मागणी केली, जेणेकरून गावातील सर्व लोकांचा सहभाग राहील. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत, सरपंच आणि चार सदस्यांनी हा ठराव घाईघाईने मासिक सभेतच मंजूर केला. हा निर्णय सरपंच आणि सदस्यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या निर्णयामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे.
दालमिया सिमेंट कंपनी व ग्राम पंचायत सांगोडा यांचे विरोधात २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण
विशेष म्हणजे, याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सचिन बोंडे आणि विद्यमान सरपंच संजना बोंडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवेश सोहळा आज, १३ सप्टेंबर रोजी तुकडोजी महाराज चौक, सांगोडा येथे पार पडणार आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
गावातील काही युवकांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भाजप प्रवेशाला राजकीय वर्तुळात वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.
माजी सरपंच सचिन बोंडे आणि विद्यमान सरपंच संजना बोंडे यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करून ते भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देणार की या प्रवेशामुळे त्यांना राजकीय संरक्षण मिळेल, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. गावातील वातावरण या घडामोडींमुळे अजूनच तापले आहे.