चंद्रपूर:- शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय समीकरणांनी आता वेग घेतला आहे. महापौरपदासाठी मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौरपदासाठी प्रशांत दानव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महापालिका सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच, शिवसेनेने घेतलेल्या एका भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेने स्पष्ट संकेत दिले आहेत की, "जो पक्ष आम्हाला महापौरपद मिळवून देण्यासाठी मदत करेल, शिवसेना त्याच पक्षासोबत जाईल."
हा एक प्रकारे शिवसेनेचा 'रिटर्न गिफ्ट' किंवा 'उपकार' फेडण्याचा पवित्रा मानला जात आहे. मनस्वी गिऱ्हे आणि प्रशांत दानव यांनी अर्ज भरल्यानंतर आता फोडाफोडीचे राजकारण किंवा युतीचे नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. संख्याबळ कोणाकडे झुकणार आणि शिवसेना कोणाची 'नौका' पार लावणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

