चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी आज आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
राज्य शासनाने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. याच अंतर्गत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली झाल्यानंतर, त्यांच्या जागी वसुमना पंत यांची नियुक्ती करण्यात आली. आज वसुमना पंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर पदभार स्वीकारला. वसुमना पंत या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, यापूर्वी त्या नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
पदभार स्वीकारताना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम आणि उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चंद्रपूर जिल्ह्यासमोर असलेले विविध प्रश्न आणि विकासकामांना नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कशी गती मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

