गावकरी शासकीय योजनांपासून वंचित.
Bhairav Diwase. April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयाला राहण्याचे सक्त आदेश असताना, सावली तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात उपस्थित राहात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या सावटाखाली असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना वेळोवेळी शासकीय निर्देशांचे पालन व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे उपस्थिती मुख्यालयात असणे अत्यावश्यक आहे. शासन प्रशासनाच्या सूचनांचे पालन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गावकऱ्यासाठी गावातील कर्मचारी हे प्रमुख दुवा आहेत. मात्र तालुक्यातील बहुतांश कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने शासनाच्या आदेशाचे योग्यरीतीने पालन होताना दिसत नाही. परिणामी ग्रामस्थांना संसर्गजन्य कोरोना विषाणू संदर्भातील माहिती अर्धवट मिळत असल्याने ग्रामस्थ भीतीयुक्त वातावरनात जीवन जगत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
111 गावे असलेल्या सावली तालुक्यात 54 ग्रामपंचायत आणि 17 तलाठी साजे आहेत. तर तीन मंडळ निरीक्षक कार्यालय आहेत. यापैकी अनेक कर्मचारी मुख्यालयात अनुपस्थित असल्याने शासनाच्या अनेक योजना ग्रामस्थ पर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासकीय योजना गावकऱ्या पर्यंत पोहोचवण्याचे काम स्थानिक कर्मचाऱ्यांचे आहे. कोरोना विषाणू चा शिरकाव ग्रामीण भागात होऊन भयंकर महामारी च्या संकटाचा सामना करावा लागू नये याकरिता शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र गाव स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्रामसेवक व तलाठी मुख्यालयात अनुपस्थित असल्याने अनेक अडचणी वाढल्याचे समोर येत आहे.
नगरपंचायत सावलीच्या मुख्याधिकारी सुद्धा मुख्यालय राहत नाही आणि कार्यालयीन कामाच्या वेळेवर हजर होत नसल्याने अनेक विकास कामे अडचणीत आलेली आहेत. कर्मचार्यांच्या मुख्यालयातील गैरहजेरीमुळे सामाजिक अंतर राखण्यास व शासकीय निर्देशांचे पालन करण्यास ग्रामस्थाना मोकळीक मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.