बिबट्याच्या हल्यात व्यक्ती ठार. #Attack #death

Bhairav Diwase
1 minute read
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील इल्लूर येथे बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी (ता. १) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शंकर गंगाराम चिताडे (वय ५५) रा. इल्लूर ता. चामोर्शी, असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्याची आष्टी परिसरातील ही दुसरी घटना आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत शंकर चिताडे इल्लूर गावाशेजारील जंगलात सरपणासाठी गेले होते. रात्र होऊनही ते घरी परत न आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याचे उघडकीस आले. या परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
आष्टी येथील इल्लूर पेपरमिल कॉलनीत १२ सप्टेंबर रोजी एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. या घटनेच्या तीन दिवसानंतर १५ सप्टेंबर रोजी आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा (कंसोबा) जंगल परिसरात एका सात वर्षीय मुलाला ठार केले. तर नुकतेच २९ सप्टेंबरला याच परिसरात महिलेला जखमी केल्याची घटना घडली होती. या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान वनविभागाने उपद्रवी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत.