लग्न समारंभ आटोपून परतताना अपघातात दोन तरुण ठार #chandrapur #gadchiroli #accident

Bhairav Diwase

गडचिरोली:- जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतताना दुचाकी कठड्याला धडकल्याने दोन तरुण ठार झाले. शहरानजीक चंद्रपूर रोडवरील वैनगंगा पुलावर ही घटना घडली.

ही धडक एवढी जोराची होती की, अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. योगेश लोहाट (२३, रा. साखरा), निकेश बांबोळे (२१, रा. चुरचुरा) अशी मृतांची नावे आहेत. १३ एप्रिल रोजी ते एका लग्न समारंभासाठी दुचाकीवरून सावली (जि. चंद्रपूर) येथे गेले होते. लग्न लावून परतताना वैनगंगा पुलावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी कठड्यावर आदळली. यात योगेश व निकेश यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला.

गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.