नवीन सत्ता समीकरणानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री एकत्र गडचिरोली दौऱ्यावर #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- राज्यातील नव्या सत्ता समीकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे तिघेही आज एकत्र गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत.

'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमासाठी हे तिघेही गडचिरोलीत येत आहेत. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांचा हा पहिलाच एकत्रित शासकीय दौरा राहणार आहे. तो ही राज्याच्या सर्वात दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात. त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या हा दौऱ्याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

आजचा कार्यक्रम हा गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना योजनांचे लाभ आणि दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री विमानाने नागपुरात पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरने नागपूर ते गडचिरोली असा प्रवास करणार आहेत.

सध्या राज्यात सातत्यानं विविध राजकीय घडामोडी घडत आहे. वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात एक भूकंप झाला होता. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत गुवाहाटी गाठली होती. त्यांनतर त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यांनी देखील काही आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार हे पुन्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले तर अन्य राष्ट्रवादीच्या 8 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. हे दोन्हीही उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्र्यांसह गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने