अहेरी:- अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली असून ही बाब चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी स्पष्ट केले आहे.
८ सप्टेंबर रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या विहीरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विहीर सुमारे २० वर्षे जुनी असून तिचा व्यास १. ३० मीटर व खोली ७. ८० मीटर आहे. सहा महिन्यांपूर्वी या विहीरीचे गाळ काढण्यात आले होते.
तपासणीदरम्यान विहीरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले तर सबमर्सीबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले. परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चुनखडक (चुनखडी - कॅल्शियम कार्बोनेट) खडक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विहीरीचे पाणी, जवळील सार्वजनिक हातपंप व इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या निष्कर्षात गरम पाणी असलेल्या विहीरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल ९२३ मि.ग्रॅ./लिटर असल्याचे आढळले.
विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी विहीरीतील पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे