Top News

वसुंधरेच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध रहा:- अनिल धानोरकर

भद्रावतीत माझी वसुंधरा योजनेचा शुभारंभ; सायकल रॅलीद्वारे शहरात जनजागृती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पृथ्वीतलावरील सृष्टी ही पंचतत्वांनी बनली आहे.या पंचतत्वाच्या प्रत्येक घटकांचे रक्षण करीत आणि आपण सर्वांनी पृथ्वीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी शहरात प्रत्येक शुक्रवारी ' नो व्हेईकल डे' राबविण्यात येणार आहे. या दिवशी शहरातील नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करीत वाहन न वापरता पैदल फिरावे अथवा सायकलचा वापर करीत पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. ते येथील नगर परिषदेतर्फे दि.२ फेब्रुवारी रोजी शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियाना अंतर्गत सायकल रॅलीच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
            
         यावेळी मंचावर वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, न.प.उपाध्यक्ष संतोष आमने, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, न.प.च्या विविध समित्यांचे सभापती चंद्रकांत खारकर, सुधीर सातपुते, विनोद वानखेडे, ठाणेदार सुनीलसिंग पवार,डाॅ.विवेक शिंदे,प्राचार्य उमाटे उपस्थित होते.
                 
        रॅलीला भद्रावती नगरपरिषद कार्यालया पासून सुरुवात झाली. ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार पासून गवराळा गणेश मंदिर पर्यंत काढण्यात आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. सदर रॅलीमध्ये शहरातील नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका भद्रावती, रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्था तथा शहरातील नागरिक सहभागी झाले होते.
                      
    या प्रसंगी मुख्याधिकारी यांनी 'माझी वसुंधरा' योजनेची माहिती दिली.तसेच उपस्थितांना वसुंधरेच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. नगर परिषदेने तयार केलेल्या नूतन दिनदर्शिकेचे वितरणही यावेळी करण्यात आले. या अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली. 
                               
 कार्यक्रमाचे संचालन न.प.चे सॅनिटरी इन्स्पेक्टर रवींद्र गड्डमवार यांनी केले.तर आभार उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने