हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी... #Jivati

Bhairav Diwase


जिवती:- महाराष्ट्रातून सुरू झालेला भोंगावाद आणि हनुमान चालीसा वाद देशभर गाजत आहे. या प्रकरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. हनुमान चालीसा व भोंग्याचा प्रश्न उपस्थित करणे हे राजकीय अपयश आहे. यांना मूर्ख म्हटले तरी हरकत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
जिल्ह्यातील आदिवासीबहुल व दुर्गम अशा जिवती तालुक्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आले होते.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचित केली. हनुमान चालिसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे, औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणे हे या लोकांचे राजकीय अपयश आहे. यांची आपण मूर्ख म्हणून गगना केली तरी काही हरकत नाही, असे कडू म्हणाले. तसेच, आज विधायक कार्यक्रम कमी आणि चालीसासारखे ब्रेकिंग कार्यक्रम अधिक दाखवले जात असल्याचा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला.
स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच सितागुड्यावर मोकळ्या जागेत एका खाटेवर निवांत झोप घेतली, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली.
आज (दि. १८) सकाळी खडकी रायपूर या गुड्यावर भेट घेऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार वामनराव चटप,तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या विविध समस्या ऐकून बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचारही घेतला.