शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिपकविले समस्यांचे निवेदन #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शिक्षण विभागातील अनियमितता दूर करून शिक्षकांच्या समस्या त्वरित निकाली काढाव्या या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करीत लक्ष वेधले. दरम्यान, निवेदन देण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक उपस्थित नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिपकवीत संताप व्यक्त करण्यात आला.

माजी आमदार नागो यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक सहभागी झाले होते. निवेदनामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार भत्ते, वेतन द्यावे, संघटनेची सहविचार सभा नियमित घ्यावी, शिक्षण विभागातील दलालांचा सुळसुळाट असून त्यांचा बंदोबस्त करावा, सेवानिवृत्त प्रकरणे तत्काळ निकाली काढावे, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव ६ महिन्यांपासून प्रलंबित आहेत, ते तत्काळ निकाली काढावे, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव १० ते १२ महिन्यांपासून प्रलंबित आहेत ते तत्काळ निकाली काढावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, शिक्षणाधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण या कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला आंदोलकांनी निवेदन चिपकवीत संताप व्यक्त केला. आंदोलनात माजी आमदार नागो गाणार, कोषाध्यक्ष विलास खोंड, किशोर धारणे, परमानंद बोपकर, प्रकार पिसे, दयानंद चिंतलवार, संदीप पिपंळकर, विवेक आंबेकर, पंकज टेकाम, हरिश बुटले, सुभाष गोतमारे, सुभाष गोतमारे, सुभाष कुरवटकर, अनिल डहाके, आदींची उपस्थिती होती.