वन शहीद आत्राम यांच्या कुटुंबाला ५० लक्षांची मदत #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0
वनमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने भारावले कर्मचारी

चंद्रपूर:- शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत, अशी ओरड नेहमीच होत असते. पण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संवेदनशील कृतीतून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबाला वनविभागातील योजनेतून २५ लक्ष रुपयांची मदत दिल्यानंतर शासनाच्या वन शहीद योजनेतून आणखी २५ लक्ष रुपयांची मदत होणार आहे. त्यांच्यातील या संवेदनशीलतेने वन कर्मचारी देखील भारावले आहेत. विशेष म्हणजे वनशहीद योजनेसंदर्भात संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातच अशाप्रकारचे शासनादेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा/देसाईगंज वनविभागात कार्यरत वाहन चालक सुधाकर बापूराव आत्राम यांच्यावर १६ सप्टेंबर रोजी आरमोरी वन परीक्षेत्रात रानटी हत्तीच्या कळपाने हल्ला केला होता. यात आत्राम यांचा मृत्यू झाला. शासन निर्णयानुसार, एखाद्या वन कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची मदत करण्यात येते. त्यानुसार ना. मुनगंटीवार यांनी वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबियांना तातडीने २५ लक्ष रुपयांची मदत केली.
आपल्या विभागातील एक कर्मचारी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आणखी काय करता येईल या विचारात ना. मुनगंटीवार होते. वन शहीद पाल्यास १८ वर्षे पूर्ण झाल्यास वनविभागात नोकरी देण्यात येईल. तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. पाल्याला नोकरी मिळेपर्यंत वेतन किंवा पेन्शन देण्याचे नियोजन केले जाईल. हे सारे निश्चित असतानाही ना. मुनगंटीवार यांना आत्राम कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणखी काहीतरी करावे असे वाटत होते. त्यांनी विविध सरकारी योजनांचा पुन्हा एकदा आढावा घेतला आणि वनशहीद योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त २५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे वनविभागाला निर्देश दिले.
शासन आदेशांनुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वन कर्मचाऱ्याला २५ लाख रुपयांची मदत करण्याची तरतूद आहे. ना. मुनगंटीवार यांनी तातडीने यासंदर्भात त्यांच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांचा धनादेश दिला. लवकरच वनशहीद या योजनेतून अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत आत्राम कुटुंबाला करण्यात येणार आहे.
वनमंत्री यांचे विशेष लक्ष्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये वनविभाग वन्य प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये भर देत आहे. संख्यात्मक वाढ करण्यासोबतच त्या अनुषंगाने होणारे अपघात त्याकडेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष लक्ष आहे.
‘असा वनमंत्री बघितला नाही’

वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. एरव्ही पीडित कुटुंबालाच सरकार दरबारी चकरा माराव्या लागतात. पण इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या तोंडून ‘असा वनमंत्री बघितला नाही’, अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया बाहेर पडली आहे.
फक्त महाराष्ट्रात असा शासन आदेश

संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र राज्याने वन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वाची तरतूद केली आहे. वन शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे शासनादेश काढण्यात आले आहेत. १२ ऑक्टोंबर २०२२ मध्ये हे शासनादेश जाहीर झाले नसते तर कदाचित स्व. आत्राम यांच्या कुटुंबाला ही मदत होऊ शकली नसती. त्यामुळे मुनगंटीवार यांना याचे श्रेय देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)