(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- रात्रीच्या वेळी घरी कोणीही नसल्याची संधी साधून दरवाज्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४९ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना येथील भोज वार्डात घडली.
प्राप्त माहितीनुसार, येथील भोज वार्ड निवासी शालिक डुडुरे हे आर.डी.कलेक्शन व आयुध निर्माणीत मजुरीचे काम करतात. दि. २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची पत्नी बाहेर गावला गेली. तर शालिक आर.डी. कलेक्शनचे काम आटोपून रात्री ८.३० वाजता घराच्या दरवाज्याला कुलुप लावुन आयुध निर्माणीत कामावर गेले. दि.२६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले व कडी लावून असलेली दिसली. त्यांनी दरवाजा उघडुन आत प्रवेश केला असता बेडरूममधील कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
कपाटात ठेवलेले आर.डी. कलेक्शनचे ७ हजार रुपये आढळून आले नाही. त्यामुळे त्यांचा चोरीचा संशय बळावला. त्यांनी लगेच बाहेर गावी गेलेल्या पत्नीला भ्रमणध्वनीवरुन दागिन्यांबाबत विचारणा केली. त्यानंतर त्या दुपारी ४ वाजता घरी परत आल्या. त्यांनी आपल्या दागिन्यांची चौकशी केली असता ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत शालिक डुडुरे यांनी भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा