Chandrapur Police Bharati: "आम्हाला न्याय द्या!" - चंद्रपुरात पोलीस भरती उमेदवारांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हजारो उमेदवारांचे स्वप्न धोक्यात आले आहे. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या १०० मीटर धावण्याच्या चाचणीत सेन्सरमध्ये बिघाड झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला असून, दि. १६ फेब्रुवारीला याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या २०२४-२५ ची पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ११ ते १४ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांनी गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांच्या मते, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत वेळेची नोंद करणाऱ्या सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड होता. यामुळे अत्यंत वेगाने धावूनही अनेक उमेदवारांच्या वेळेची अचूक नोंद झाली नाही आणि त्यांना कमी गुण मिळाले. या तांत्रिक त्रुटीचा फटका केवळ १०० मीटर चाचणीलाच बसला.


उमेदवारांच्या प्रमुख मागण्या:
  1. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या १०० मीटर चाचणीचे पुनरायाेजन करावे.
  2. सेन्सरच्या तांत्रिक तपासणीचा अहवाल सार्वजनिक करावा.


मैदानावर रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या तरुणांचे म्हणणे आहे की, "आम्ही वर्षभर मेहनत केली, पण केवळ एका तांत्रिक बिघाडामुळे आमचे गुण कमी झाले तर तो आमच्या कष्टावर अन्याय आहे." समस्त उमेदवार आणि मार्गदर्शकांनी एकत्रितपणे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.