Percentage and Percentile : पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक कळत नाही तर ही बातमी तुमच्यासाठी....

Bhairav Diwase
प्रवेश परीक्षांमधील टक्केवारी व पर्सेटाइल : संकल्पना आणि त्यांतील फरक.
टक्केवारी (Percentage) म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले हे दर्शवते. म्हणजेच, निश्चित गुणांकन पद्धतीनुसार विद्यार्थ्याची वैयक्तिक कामगिरी त्यातून दिसून येते. याउलट, पसेंटाइल (Percentile) हे त्या विद्यार्थ्याने त्याच परीक्षेला बसलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली, हे दर्शवते.


दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा देतात. मात्र, टक्केवारी (Percentage) आणि पसेंटाइल (Percentile) या दोन्हींचा अर्थ एकच आहे, असा गैरसमज अनेकदा केला जातो. या दोन्ही संज्ञा ऐकायला सारख्या वाटल्या, तरी त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीचे दोन वेगवेगळे पैलू दर्शवतात. टक्केवारी (Percentage) म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले हे दर्शवते. म्हणजेच, निश्चित गुणांकन पद्धतीनुसार विद्यार्थ्याची वैयक्तिक कामगिरी त्यातून दिसून येते. याउलट, पसेंटाइल (Percentile) हे त्या विद्यार्थ्याने त्याच परीक्षेला बसलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली, हे दर्शवते. म्हणजेच, केवळ मिळालेल्या गुणांवर नव्हे, तर सर्व परीक्षार्थ्यांमध्ये त्या विद्यार्थ्याचे स्थान काय आहे, हे पर्सेटाइलमधून समजते.


उदाहरणार्थ, अलीकडे CET परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चामध्ये सुमारे १,२०० विद्यार्थ्यांना बारावीच्या टक्केवारीच्या तुलनेत प्रवेश परीक्षेत खूप जास्त पसेंटाइल मिळाल्यामुळे विशेषतः चर्चेत आणले जात आहे


या विद्यार्थ्यांची माहिती सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यात आली आहे. मात्र, अशा आरोपांचा संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा पुरेसा विचार होणे आवश्यक आहे. कोणताही ठोस निष्कर्ष निघण्यापूर्वी होणाऱ्या सार्वजनिक चर्चा आणि तर्क-वितर्कामुळे विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण येऊ शकतो आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.


हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुण आणि प्रवेश परीक्षेतील कामगिरीतील असा फरक केवळ CET मध्येच नाही, तर JEE सह इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्येही दिसून येतो. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी या प्रकरणांचे सर्वंकष विश्लेषण करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांनी JEE परीक्षेतही तितकीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावरून त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षांमधील यशामध्ये सातत्य दिसून येते आणि ही कामगिरी केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नसून विविध प्रमाणित स्पर्धात्मक परीक्षांमध्येही दिसून येते. ही बाब परीक्षेला बसलेल्या जवळपास १८ लाख विद्यार्थ्यांच्या संदर्भातही पाहणे आवश्यक आहे. चर्चेत असलेली ही प्रकरणे एकूण परीक्षार्थ्यांच्या ०.००७% पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी व्यापक संदर्भ आणि उपलब्ध माहिती समजून घेणे आवश्यक आहे. कोटा, दिल्ली, नागपूर, पुणे आणि इतर शहरांमधील नामांकित कोचिंग केंद्रांचे अस्तित्व हेच दर्शवते की बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा यांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहे. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना विशेषतः


स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसाठी तयार केले जाते, कारण या परीक्षांमधील यश हे केवळ शालेय परीक्षेतील टक्केवारीवर नव्हे, तर लाखो परीक्षार्थ्यांच्या तुलनेत केलेल्या कामगिरीवर अवलंबून असते. म्हणूनच, या दोन्ही परीक्षांमधील मूलभूत फरक समजून न घेता बारावीच्या टक्केवारीची थेट प्रवेश परीक्षेतील कामगिरीशी तुलना करणे, स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा घेण्यामागील मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष करणारे ठरते.


बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुण आणि प्रवेश परीक्षेतील गुण यांना समान मानणे म्हणजे स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यामागील उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे आहे. जर या दोन्ही परीक्षा एकाच प्रकारचे मूल्यमापन करण्यासाठी असत्या, तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश केवळ बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे देता आला असता. त्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्याची गरजच भासली नसती.


मात्र, स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा या विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य, अभिक्षमता (Aptitude), वेग आणि समान व प्रमाणित परीक्षेच्या वातावरणातील कामगिरी यांचे मूल्यमापन करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच देशभरातील विद्यार्थी या परीक्षांसाठी स्वतंत्रपणे आणि विशेष तयारी करतात.


टक्केवारी (Percentage) आणि पसेंटाइल (Percentile) यांतील फरक समजून घेतल्यास विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिक परीक्षा निकालांचा अधिक अचूक अर्थ लावू शकतात. तथ्ये, आकडेवारी आणि योग्य संदर्भ यांच्या आधारे होणारी माहितीपूर्ण चर्चा स्पर्धात्मक परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या व यश मिळवणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.