चंद्रपूर:- 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून चंद्रपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होणार असून, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस आणि चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, संपूर्ण देशवासीयांच्या मनात गर्व आणि अभिमानाची लहर उसळली आहे. या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि लष्कराच्या शौर्याला मानाचा मुजरा करणाऱ्या तिरंगा रॅलीचे आयोजन चंद्रपूरमध्ये करण्यात आले आहे.
ही रॅली केवळ एक मिरवणूक न राहता, ती देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्कराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभूमीबद्दलचा अभिमान असावा, हीच या रॅलीमागची भावना असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होईल. यानंतर ही रॅली गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत येईल आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. तरुणाईचा, महिला मंडळांचा, विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि चंद्रपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. या देशभक्तीपूर्ण रॅलीत सहभागी होऊन आपल्या लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.