चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून कायदा व सुव्यवस्था कडक करण्यासाठी एक अत्यंत मोठी आणि धडक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आता गुन्हेगारांची खैर नाही, कारण चंद्रपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे. खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या तब्बल २७० आरोपींची पोलिसांनी विशेष ओळख परेड घेतली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या थेट उपस्थितीत ही मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या परेड दरम्यान पोलीस अधीक्षकांनी स्वतः सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली आणि त्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. न्यायालयाने जामीन मंजूर करताना ज्या अटी आणि शर्ती घातल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन करावे, अशा कडक सूचना गुन्हेगारांना देण्यात आल्या आहेत. जर एकाही अटीचा भंग झाला, तर थेट जामीन रद्द करून पुन्हा जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड दमच एसपी आयुष नोपाणी यांनी दिला आहे.


