Chandrapur News: अरुण लखानी यांनी आ. किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महाकाली मातेचे घेतले दर्शन*

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अरुण लाखानी यांचे चंद्रपुरात प्रथमच आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पूजा-अर्चना कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.


यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ विभागाचे संघटन प्रमुख डॉ. उपेंद्र कोटेकर, आमदार करण देवतळे, नोंदणी प्रभारी सुधीर दिवे, तुषार सोम, बलराम डोडाणी, मनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टी, यांच्या सह सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची आदिंची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीही अरुण लाखानी यांनी महाकाली मातेचे दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद मागितले होते. बिनविरोध निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा चंद्रपुरात येत त्यांनी महाकाली मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.


          10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले आणि देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने श्री महाकाली मंदिरात विशेष पूजा-अर्चनेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेतील यशस्वी वाटचालीसाठी यावेळी महाकाली मातेच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली.


            या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करत त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्रभावीपणे विधान परिषदेत मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लाखानी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
           

 यावेळी अरुण लाखानी यांनी महाकाली मातेच्या आशीर्वादामुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासह कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे ही संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे, हेच आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.